जीवन संघर्ष : तरूण नव कविच्या मनातील धगधगणारी दाहकता
[ पुस्तक परिक्षण / अभिप्राय लेखक :- भीमराव रायभोळे,
आय.ई.एस. (सेवानिवृत),
कवी आयु. नवनाथ रणखांबे ह्यांचा ‘जीवन संघर्ष’ नावाचा 26 नोव्हेंबर 2018 साली प्रकाशित झालेला काव्यसंग्रह वाचण्यात आला. आयु. प्रा. डॉ. शहाजी कांबळे यांची या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लाभली आहे, तर मलपृष्ठावरचा मौलिक अभिप्राय आयु. प्रा. दामोदरजी मोरे यांचा आहे. आयु. रणखांबे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह, तरीही ह्या काव्य संग्रहाची चर्चा आज पुऱ्या महाराष्ट्रभरात होत आहे, त्याचे कारण असे की, त्यांच्या कवितेच्या आशयावर आयु. प्रा. शुक्राचार्य गायकवाड, आयु. डी. एल. कांबळे, आयु. संजय थोरात यांच्यासहित अनेक दिग्गज कवी-लेखकांनी लिहिलेले परिक्षणाचे-अभिप्रायाचे वर्तमानपत्रात भरभरून येणारे रकाने व त्या निमित्ताने त्यांना मिळणारे पुरस्कार. आजघडीला ह्या काव्यसंग्रहावर नव्वदीच्या वर परिक्षणे व अभिप्राय नोंदविल्याचे माझ्या कानावर आलेले आहे. त्यामुळे कवी आयु. रणखांबेंच्या काव्यसंग्रहाची उंची वाढलेली आहे. कवी आयु.रणखांबे यांचा ‘जीवन संघर्ष’ हा काव्यसंग्रह वाचल्यावर कदाचित माझ्या मनाच्या कोपऱ्यात असलेल्या कवी मनाला (?) कांही कवितांवर दोन शब्द लिहून त्यात माझ्याही अभिप्रायाची भर पडावी, असे वाटल्यामुळे मी दोन शब्द लिहिण्याचे धाडस करीत आहे. या काव्यसंग्रहाच्या शेवटी दिलेला त्यांचा परिचय वाचल्यानंतर असे लक्षात येते की, आयु. रणखांबे हे सतत संघर्ष करणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी केलेल्या कामाचा पसारा वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर दूरदूरवर पसरलेला आहे, खरं तर त्यांच्या मनात असलेल्या गरूड पक्षाची ती झेपच आहे व त्यामुळेच मुखपृष्ठावरच्या झेप घेणाऱ्या गरूडपक्ष्याचे चित्र या काव्यसंग्रहास साजेसेच आहे.
कवी आयु.रणखांबे यांच्या कवितांना एका ठराविक साच्यात बंद करता येत नाही, कारण त्यांच्या काव्याला वेगवेगळे पदर आहेत: त्यात भगवान बुद्धांची शिकवण व डॉ.बाबासाहेबांचे तत्वज्ञान तर आहेच,आईवडिलांनी त्यांच्या बालमनावर केलेले संस्कार व ऋण, दुष्काळ व पावसाअभावी बेजार झालेल्या शेतकऱ्यांची व शेतमजुरांची व्यथा, झाडांच्या कत्तलीबद्दलची खंत, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, प्रेमाची ओढ व हळुवारपणा व विरहाचं बोचणार दु:ख, वाढणारी सामाजिक विषमतेची दरी, भटक्यांचं जगणं- मरणं, दु:खाचा बाऊ न करता त्यावर मात करण्याचा संदेश, असे कितीतरी पदर त्यांच्या काव्यातून पाहण्यास मिळतात. त्यांच्या ‘ऋण’, ‘माय मी तुला पाहिलय’ आणि ‘बा’ ह्या त्यांच्या आईवडिलांवरच्या कवितांमधून आईवडिलांनी केलेल्या कष्टाची, ऋणाची परतफेड करण्याचा संदेश मिळतो. त्यांनी आईच्या असंख्य स्मृती मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्यात. त्या वाचल्या की, हृदय पिळवटून जातं.
“ तुझ्या जीवन संघर्षाचा,
संग्राम पाहून…..
काळ स्तब्ध झाला अन्….
संघर्ष गहिवरला..ओथंबलेल्या डोळ्यांनी ….
...............ढसा ढसा रडला !
माझ्या स्मृतीने,
संघर्ष रडतांना माय, त्याला मी पाहिलंय.”
त्यांनी आईच्या संघर्षाची केलेलं हे कवण अफलातून आहे.
“ ‘ बा’ ओरडला,
लेका आजपासून तुझी
शिक्षण हीच ‘आई’…..
करियर हाच ‘बा’…
मुंबई हीच पांढरी…..’
कितीतरी मोलाचा हा संदेश आहे. कवी आयु.रणखांबे यांच्या वडिलांच्या त्यांनी कवन केलेल्या ‘बानं शिकविलं’ या कवितेतील वरील आठवणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिक्षण वाघीनीचं दूध आहे…… खेडेगाव सोडा, नि शहरात जा !’ हा मोलाचा संदेश देतात. त्यांच्या वडिलांनी जसा त्यांना संदेश दिला, तसा प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलास द्यावा, जणू ते असेच सुचवितात.
“ अजूनही आहे बाजार बुणग्यांची…..
सामाजिक भटकंती पोटाची….
पिढ्यान् पिढ्या त्यागाची….
पोटाच्या जीवन संघर्षाची,…….
स्वातंत्र्य मिळता सात दशके अजूनही आहेत वंचित….” आपल्या ‘भटकंती पोटाची अधोगती देशाची’ या कवितेत त्यांना समाजाच्या भटक्यांबद्दलची कणव जाणवते. गोंधळी, वासुदेव, पांगुळ, नंदी बैलवाले, तुडबुडके, डोंबारी, मदारी, कैकाडी इत्यादि एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरीत होणाऱ्या जाती आपण बालपणी पाहिल्यात. ह्या जाती वर्तमानात कोणत्या अवस्थेत आहेत, याचा कोणी विचार करत नाही.आपल्या कवनाव्दारे कवी आयु.रणखांबे यांनी वरील जात समूहाबद्दल वाचकांचे व पयार्याने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते.
‘…..सामाजिक आर्थिक, विषमतेची दरी,
खोलवर एतद्देशीय भेद भारी….....’
त्याच कवितेतील पुढील ओळीत हा जातसमूह विस्थापित होण्यास येथील जाती विषमताच कारणीभूत आहे हे सांगण्यासही ते चुकले नाहीत. आपल्या ‘दाहकता’, ‘मानवतेला डाग’, ‘जातीचे ग्रहण,’ आणि ‘जीवन संघर्ष’ या कवितांमधून सामाजिक विषमतेत भरडला जाणारा उपेक्षित समाज, व धर्मांध झालेल्या हैवानांची क्रुर कृत्य सांगताना अमानवी छळाच्या विरोधात होणारा कोंडमारा सहन न करता, त्याविरूद्ध जणू पेटून उठण्याचे कवी आयु. रणखांबे अशा उपेक्षितांना आवाहनच करतो. त्यांच्या ‘दाहकता’ या कवितेतील ते शब्द अगदीच उदबोधक आहेत,
“अमानवी छळांनी- क्रुर कृत्यांनी…
मानवता हादरली- धर्मजातींच्या उतरंडीनी….
दिसूनही न दिसणारी दाहकता….
कळला नाही अजूनही कोंडमारा !”
किंवा ‘जीवन संघर्ष’ या कवितेतीत त्या ओळी हृदय पिळवटून टाकतात,
“ सामाजिक घोर अन्यायाचा,
मानवतेला वेदना फासणाऱ्या क्षणांचा…
हे वेदनाचे तळे….
हृदयाच्या जाळ्यात किती दिवस साठवून ठेवायचं…
असं किती दिवस चालायचं ?”
कवी आयु.नवनाथ रणखांबे यांच्या बहुतांश कवितेत आर्थिक, सामाजिक, विषमतेविरूद्धची, जातीयवादी मानसिकतेची, धर्मांधांच्या क्रुर कृत्याची, माणूसकी संपल्याबद्दलची, व्यवस्थेत असलेल्या भ्रष्टाचाराची अपार चीड व खंत आहे, शेतकरी, शेतमजूर, भटके इत्यादिंच्या दु:खाची कणव आहे. सारांश:बहुतांश कवितांची नाळ सामाजिक बांधीलकीशी जुळलेली आहे. शेवटी भगवान बुद्धांच्या शांतीची, समानतेची, व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाची ते आपल्या कवितांमधून कास धरतात. शिक्षण घेऊन जीवनात संघर्ष करीत राहून गरूड पक्षासारखी झेप घेऊन यशस्वी होण्यासाठी कवी आयु. रणखांबे यांच्या बहुतेक कविता प्रेरणा देतात. त्यांची भाषाशैली ओबडधोबड जरी असली किंवा कविता छंदोमय असल्या किंवा नसल्या, तरी त्या कवितांमधून त्यांना जो संदेश द्यायचा, त्याची दिशा अयोग्य आहे असे मात्र म्हणता येणार नाही. बहुतेक दिग्गजांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे व जसजसा या क्षेत्राचा त्यांचा अनुभव वाढेल, तेंव्हा ही तथाकथित कमतरता आपोआप नष्ट होईल. त्यांच्या या क्षेत्रातील वाटचालीस माझ्या शुभेच्छा…
भीमराव रायभोळे,
आय.ई.एस. (सेवानिवृत)
(8600632495/ 9767215881)
पुस्तक :- जीवन संघर्ष
कवी :- नवनाथ रणखांबे
पुस्तक प्रकाशन :- शारदा प्रकाशन ठाणे
मूल्य -: ८०₹
पुस्तक अभिप्राय / परीक्षण लेखक :-
भीमराव रायभोळे,आय.ई.एस. (सेवानिवृत)
0 Comments