GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

ओ‌ वुमनीया...महिला दिन विशेष लेख

ओ‌ वुमनीया...



"वो स्त्री है कुछ भी कर सकती है" साधारण वर्षभरापूर्वी एका मूवीमधला हा डायलोग प्रचंड फेमस झाला आणि यावर असंख्य मिम्स ही सोशल मीडियावर पहायला मिळाले. थट्टा करण्यांसारखं  खरंतर यात काहीच‌‌ नाही कारण नक्कीच संधी मिळाल्यास कितीही अवघड‌ काम एक स्त्री यशस्वीरित्या पूर्ण करू शकते. 
आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्त्रियांचे महत्त्व लक्षात घेता असे सांगितले गेले आहे की “यत्र नारायस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता” म्हणजे जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तेथे देवता वास करतात.
 स्त्री हा एक शब्द. आणि सहनशीलता,समर्पण,सृजनशिलता,संवेदनशीलता,संघटन कौशल्य असे 
एका स्त्रीमध्ये इतक्या शक्ती असूनही, तिच्या सक्षमीकरणाची आज खूप गरज आहे.
 स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण म्हणजे त्यांचे आर्थिक निर्णय, उत्पन्न, मालमत्ता आणि इतर गोष्टींची उपलब्धता, फक्त या सुविधा मिळवून ते त्यांचा सामाजिक दर्जा उंचावू शकतात.
   आजघडीला भारतातील स्त्रियांच्या स्थितीचा विचार केला तर दोन‌ किंवा तीन दशकांपूर्वीच्या तूलनेत  शिक्षण व राजकीय प्रतिनिधित्व या बाबतीत भारतीय स्त्रीयांची स्थिती सुधारली असली, तरी आर्थिक स्तर व आरोग्य या क्षेत्रांत अद्याप विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे. मतदानाचा हक्क नसणे,वारसाहक्क‌नसणे,शिक्षणाचा अधिकार नसणे, देवदासी, सती जाणे,बालविवाह या अशा प्रथांपासून आधुनिक स्त्रीयांना मुक्ती मिळाली आहे पण तरीही वेतनामधील असमानता,कार्यक्षेत्रातील असुरक्षीतता/लैंगीक‌छळ, स्त्री म्हणून दुय्यम वागणूक मिळणे व ग्रामीण भागातील महिलाना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध‌ नसणे,पुरेशा आरोग्य सुविधांचा किंवा त्यासंबंधी जागरुकतेचा आभाव या समस्या आज दृढ आहेत.
   जगात आज सर्व क्षेत्रांतील महिलांचे योगदान तत्त्वतः मान्य करण्यात आले आहे; परंतु कळीचा मुद्दा असतो तो संपूर्ण धोरण-निर्णयप्रक्रियेत महिलांना काय स्थान असते हा
. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या २०१६ च्या स्त्री- पुरुष समानताविषयक निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक १४४ देशांमध्ये ८७ वा आहे. हा निर्देशांक आर्थिक स्तर, शिक्षण, आरोग्य व राजकीय प्रतिनिधित्व या चार निकषांच्या आधारे स्त्री- पुरुष समानतेची निश्‍चिती करतो. भारताचा क्रमांक मागील वर्षाच्या तुलनेत (१०८ वरून ८७ वर) सुधारला. शिक्षण व राजकीय प्रतिनिधित्व या बाबींवर हा क्रमांक वर गेला आहे. एकीकडे
 ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, मेरी बेटी मेरा अभिमान हे ट्रेंडिंग होत असताना व  महिलांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा, महिला कामगारांच्या मजुरी संबंधी योजना आखल्या जातात तर दुसरीकडे  अनेक महिलांना आजही आपले अधिकार हक्क आपल्या साठी केल्या गेलेल्या तरतुदी यांची पुरेशी जाणीव नाही. त्यामुळे आपले  हक्क डावलले जाताहेत हेच त्यांना‌ कळत नाही. त्यामुळे मग या हक्कांसाठी लढणे व ते मिळविणे या गोष्टी दुरापास्त होतात. आजच्या समाजातील स्त्री, तिचे प्रश्न, तिचे समाजातील, अर्थव्यवस्थेतील स्थान या सगळ्यांची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत आहे, ही कल्पनाच स्त्रियांना उभारी देणारी आहे. मात्र महिला सक्षमीकरण म्हणजे कुणी गिफ्ट म्हणून दिलेलं पुष्पगुच्छ असणार नाही तर यासाठी स्वतः स्त्रीयांना लढावं‌ लागेल व समविचारी उन्नत विचाराच्या पुरुषानाही यासाठी सहकार्य करावं  लागेल‌.यासाठी प्रत्येक घटकातील प्रत्येक स्तरातील स्त्री ही शिक्षणाच्या रोजगाराच्या मुख्यप्रवाहाशी जोडली जाईल हे उद्दिष्ट ठरवून  सर्व समाजहितासाठी काम करणाऱ्या संस्था, समाजातील,शासकिय यंत्रणेतील महत्वाचे स्टेकहोल्डर्स यांनी समन्वयाने एकत्रीतपणे साध्य करण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे.

आज कोविड महामारीच्या आफ्टर इफेक्ट्स मधून‌ बऱ्याच अंशी बाहेर आलो असलो‌ तरी समाजामध्ये या लोकडाऊन नंतर स्त्रियांसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. गरिबी,लिंगभेदामुळे  वेतनामधील असमानता या गोष्टी वाढल्या आहेत.उपजिविकेचे नुकसान झाले आहे.यातून होणाऱ्या मानसिक त्रासातून‌,फ्रस्ट्रेशनमधूश कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. ज्या आर्थिकदृष्टय़ा कमकुवत घटकांचे व्यवसाय बंद‌झाले किंवा उपजिवीका हिरावल्या गेल्या त्या घटकांमधील मुलींचे शिक्षण बंद झाल्याचे प्रमाण खूप जास्त आहे. किशोरवयीन मुलींची शाळा सोडणे व बालविवाह यांची संख्या या काळात वाढली आहे. तसेच स्त्रीयांच्या मानसिक स्वास्थ्य व वाढलेल्या घरगुती कामाच्या ताण,आर्थिक अडचणी यामुळे शारिरीक स्वास्थ्याच्या समस्या ही वाढल्या आहेत. अनेमिया/रक्ताची कमतरता, मासिक पाळीच्या समस्या, कुटुंब नियोजनाविषयी माहितीचा आभाव,पोषक आहाराचा आभाव या समस्या अजूनही ग्रामीण भारतातील तळागाळातील भागात पाय रोवून आहेत.
या सर्व बाबींसाठी सरकारने काहीतरी केलच पाहिजे असं फक्त म्हणत बसण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीनें आपल्या आसपासच्या भगिनींची शक्य तशी शक्य तितकी मदत केलीच पाहिजे. मदत कुठल्याही स्वरूपाची असो, बालविवाह थांबविणे, मुलींना परत शिक्षणाकडे वळण्यासाठी सहकार्य करणे, आर्थिकदृष्टय़ा मदत होईल यासाठी‌ व्यवसाय,स्वयंसेवी गट चालू करणे असे कुठल्याही स्वरूपाची मदत आपण करू शकतो. प्रत्येक दिवस हा महिला दिवस होवो, प्रत्येक दिवस साजरा होवो यासाठी शुभेच्छा...!


डाॅ. भाग्यश्री विरभद्र घाळे
तालुकाध्यक्षा - राष्ट्रवादी कॉंग्रेस डाॅक्टर सेल, उदगीर 

Post a Comment

0 Comments