सरपंच आरक्षण सोडत/ सरपंच व उपसरपंच यांची निवड
निवडणूक मतदानानंतर 30 दिवसाच्या आत होणार
लातूर : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत निवडणूकीची आचार संहिता लागू झालेली आहे. तथापि राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूकीची उद्धोषणा होण्यापूर्वी काही जिल्हयामध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत काढलेल्या होत्या व अद्यापही बहुतांशी जिल्हयांमध्ये आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही.
सरपंच पदाचे आरक्षणानंतर संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इ. कारणांमुळे निवडणूक रद्द करुन पुनश्च नव्याने निवडणूक घेणे क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर वरील बाबींचा सारासार विचार करुन सरपंच आरक्षण सोडतीबाबत एकसमान धोरण असणे व होणारे गैरप्रकारांना पायबंद बसण्याकरिता तसेच योग्य व्यक्तीस न्याय मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने ज्या जिल्हयामध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत कार्यक्रम यापूर्वी राबविण्यात आलेला आहे. सदर प्रक्रीया रद्द करुन नव्याने घेण्याबाबत निर्णय घेतला आहे.
आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक मतदान कार्यक्रम दि.15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे व निवडणूक निकालाची अधिसूचना दि.21 जानेवारी 2021 प्रसिध्द होणार आहे.सबब सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच सरपंच व उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर तथापि 30 दिवसाच्या आत राबविण्यात यावा असे ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी विवेक शिंदे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0 Comments