छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2021
निमित्त मार्गदर्शक सूचना जारी
लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठया प्रमाणात साजरी केली जाते. कोविड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेतअसे उपसचिव गृह विभाग यांनी कळविले आहे.
या अनुषंगाने पूढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड / किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्यााबाबत व्यवस्था करण्यात यावी.
तसेच कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन फक्त 10 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असे ही पत्रकात नमुद केले आहे.
0 Comments