पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूजल वार्ता ई-अंकाचे विमोचन
लातूर : राज्यात होत असलेल्या भूजलाच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. भूजलाचा अतिवापर हा प्राणीमात्रास अत्यंत बिकट परिस्थिती कडे घेऊन जात आहे. भूजलाचे महत्व जनसामान्यापर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे. हा दृष्टिकोन विचारात घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने भूजल जागृती करण्याचे काम चालू ठेवलेले आहे. याच अनुषंगाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने "भूजल वार्ता " हा ई-अंक सुरू केला असून या अंकाचे विमोचन पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जल जीवन मिशन च्या संचालिका श्रीमती आर. विमला, भूजल चे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी.एन. संगनवार, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, गट विकास अधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या उपअभियंता यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
भूजलाचे व्यवस्थापन ही काळाची गरज असून ग्राम स्तरावर त्याचे नियोजन होणे आवश्यक तेवढाच वापर होणे क्रमप्राप्त आहे. याचाच एक भाग म्हणून या वर्षीपासून भूजल वार्ता हा उपक्रम सुरू करण्याचे यंत्रणेने योजले आहे. याद्वारे भुजला विषयी जनजागृती करणे हा हेतू तर आहे सोबतच यंत्रणेच्या महत्त्वाच्या घडामोडी व कामकाजाची माहिती तसेच विविध योजना, यशोगाथा, भूजल क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी माहिती यांचा देखील समावेश असणार आहे. भूजल वार्ता हे ई- बुलेटीन स्वरूपात असल्याने यंत्रणेच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येणार आहे. तसेच व्हाट्सअप, ट्विटर या समाज माध्यमातून देखील व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकापर्यंत भुजला विषयी माहिती पोहोचू शकेल. या भूजल वार्ता ई-बुलेटीन चे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुंबई येथून तर पाणीपुरवठा व स्वाच्छीता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लातूर येथून विमोचन आज करण्यात आले.
0 Comments